Manoj Jarange Patil : मराठ्यांना खवळून घेऊ नका : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
सेलूतील सभेला लोटला मराठा जनजागर, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी, ‘नूतन’चे मैदान फुल्लं
सरकारने आता तरी भानावर यावे. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करून नये. महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा देऊन जरांगे पाटील म्हणाले, की कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. १९६७ च्या आधीपासूनचे पुरावे सापडले आहेत. गायकवाड आयोगाने मराठ्यांना बारा-तेरा टक्क्यांनी मागास सिद्ध केले. सर्व निकष पूर्ण केले तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकष पूर्ण केले नाहीत, तरी त्यांना आरक्षणात घेतले. ज्या लेकरांची एका टक्क्याहून संधी हुकली. त्या लेकराचे आयुष्य आणि भविष्य उध्द्वस्त झाले आहे, याची जाणीव असू द्या. मराठ्यांच्या डोक्यात आले, तर लेकरांच्या हितासाठी मराठा कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पण मराठ्यांनाही मर्यादा आहेत, असा निर्वाणाची इशाराही जरांगे यांनी सभेतून दिला.
सकाश प्रतिनिधी,सेलू : मराठे तुमचेच आहेत. यांनीच तुम्हाला गादीवर बसविले आहे. तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांना वाकड्या वाटेला जाऊ देऊ नका. आणखीही संधी, वेळ गेलेली नाही. दोन दिवस हातात आहेत. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे. मराठा आरक्षणाचा विषय गांभार्याने घ्यावा, तोडगा काढायचा प्रयत्न करावा. विनाकारण नोटीसा बजावून आता जास्तीच मराठ्यांना खवळून घेऊ नका, असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सेलू (जि.परभणी) येथील सभेत सरकारला केले आहे.
सेलू तालुक्यातील अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर गाठी-भेटी दौऱ्यांतर्गत शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी जरांगे पाटील बोलत होते. भर उन्हात सभेला लाखोंच्या संख्येने मराठा जनजागर लोटला होता. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृटी करून जरांगे यांनी अभिवादन केले. मराठा भगिनींनी जरांगेंचे औक्षण केले. सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील हुतात्मा अनंत लेवडे यांच्या आईवडीलांच्या हस्ते जरांगे यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
महिलांचा आजपासून जागर
आरक्षणासाठी मराठ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यात आहे. ८० टक्के लढाई जिंकली आहे. त्यामुळे बेसावध राहू नका. अशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्ही खांद्याला खांदा लावून लढा. मी मरायला भीत नाही. सरकारने मला शत्रू मानायला सुरूवात केले आहे. मी त्यांनाही भीत नाही. पण आता बेसावध राहू नका. एकजूट दाखवा. गावेची गावे पिंजून काढा. जागृती करा. महिलांनीही मागे हटू नका. २३ डिसेंबरपासून महिलांनीही दररोज आरक्षणाचा जागर घालायला सुरूवात करावी. पोलिसांना सहकार्य करा, शांततेत आंदोलन करा. राजकारण्यांचे ऐकू नका. त्यांनी फूट पाडयाचा प्रयत्न केला, तर लेकरांचे वाटोळे होईल. मी जीवाची पर्वा न करता, बाजी लावली आहे. तुमच्या पाठबळाची गरज आहे. मराठे मागे हटणार नाहीत. आरक्षण मिळवून देणारच, असा शब्द जरांगे यावेळी दिला. दरम्यान, जरांगे यांचे ३१ जेसीबीचतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सभास्थळी चोहोबाजूंनी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. घराच्या छतावर, रस्त्या रस्त्यावर, नूतन महाविद्यालयाच्या सागवान झाडांच्या प्रकल्पात बसूनही मराठा बांधवांनी सभेला हजेरी लावली.
भानगडी नको, तोडगा काढा
समितीला ५४ लाख मराठा आरक्षणासाठीच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. याच नोंदीप्रमाणे अहवाल स्वीकारून सरकारला कायदा पारीत करायला काय अडचण आहे, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. याच नोंदी सत्तर वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या, तर आरक्षणामुळे मराठा समाज प्रगत म्हणून जगात पुढे आला असता. परंतु जाणूनबुजून आरक्षण दिले नाही. नोंदी असूनही कुळापासून लपवून ठेवल्या, असा घणाघात जरांगे यांनी यावेळी केला. आरक्षणावरून एकाही पोराला त्रास झाला, तर सर्वांनी त्याच्या पाठीशी राहा. एकाला अटक केली, तर सर्वांनी शांततेत पोलिस ठाण्यात जाऊन बसा. सरकारला अटक करायची लय खुमीखुमी असेल, तर खुशाल सगळ्यांना अटक करा, असेही जरांगेंनी सरकारला ठणकावले. मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत. मग देव जरी आडवा आला, तरी मराठ्यांना आरक्षणापासून कोणी अडवू शकत नाहीत. तोडगा काढा. बाकीच्या भानगडीत पडू नका, असेही जरांगेंनी नमूद केले.
मुंबई बघायची नाही ?
सभास्थळी “२५ डिसेंबरला मुंबईत”, अशा आशयाचे बॅनर झळकले होते. मुंबईतील आंदोलनाबाबत सकाळी पत्रकार परिषदेतही मनोज जरांगेंना पत्रकारांनी विचारणा केली. पंरतु, जरांगेंनी यावर भाष्य टाळले. मात्र, जाहीर सभेत मिश्किल भाषेत टिप्पणी करून मुंबई गाठायचा इरादा पक्का केल्याचे दिसून आले. जरांगे म्हणाले, ” समजा, आम्हाला मुंबुईला जायचे नाही, पण जायचे ठरलेच, तर मग अडचण काय ? आम्ही मुंबई बघायची नाही का ? सगळी दुनिया बघती. आम्ही महाराष्ट्राचे नाहीत का ? विमान बघू द्या, शेअर मार्केटचा बैल बघू द्या. हिरो हिरॉईन बघू द्या. तुम्हाला काय अडचण आहे ? मंत्री कोणत्या बंगल्यात राहातात ? कसे झोपतात ? जवळ येऊ देऊ नका, पण लांबून तरी मंत्रालय बघू द्या की ?