श्री केशवराज बाबासाहेबांचा यात्रा महोत्सव : शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद, सेलूमध्ये दर्शनासाठी रीघ
सेलू जि.परभणी : शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या (व्यंकुशाह) २२४ व्या यात्रा महोत्सवाचा मंगळवारी, २६ डिसेंबररोजी (श्री दत्त जयंती) मुख्य दिवस होता. यानिमित्ताने महापूजा, महाआरती झाली. व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक भंडारा महाप्रसाद घेण्यासाठी सेलूसह परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठीही सकाळपासूनच रीघ होती.
दुपारी साडेबारा वाजता ‘श्रीं’च्या तीर्थप्रसाद शिंपणानंतर श्रीसाईबाबा मंदिर परिसरात महाप्रसादाला सुरुवात झाली. या वेळी वेळी मुकेशराव बोराडे, अशोक मंत्री, झंवर, गंगवाल, मालाणी, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सतीश दिग्रसकर, राजू पटेल, बाळू मंत्री आदींसह व्यापारी मंडळांची मोठी उपस्थिती होती. महिला, पुरूष, भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सेलूतील व्यापारी मंडळ, साईबाबा संस्थान, श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान, यात्रा कमिटी तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाप्रसादाच्या शिस्तबद्ध वाटपासाठी परिश्रम घेतले. सोमवारी श्रीमद् भागवत कथेची सांगता झाली. सभापती अशोक काकडे यांच्या वतीने आयोजित महाप्रसादसाठीही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भागवताचार्य नंदकुमार गोंदीकर महाराज यांच्यासह श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे वंशज लक्ष्मीकांत सुभेदार, राम सुभेदार तसेच माजी आमदार विजय भांबळे, उद्योजक रामप्रसाद घोडके, सभापती चक्रधर पौळ, पुजारी नितीन जोशी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिला काकडे, किशोर जोशी, सूर्यकांत बिन्नीवाले, सुभाष कुलकर्णी, माधव वानरे आदींची उपस्थिती होती. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. रात्री पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे श्रीहरि कीर्तन झाले. या वेळी संस्थानचे पुजारी केशव, वामन, पुरुषोत्तम, सुधीर मंडलिक यांची उपस्थिती होती.
पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात
श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकूशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी,२६ डिसेंबररोजी पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. श्री दत्त जयंतीला यात्रेचा मुख्य दिवस असतो. यानिमित्ताने सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ होती. दुपारी तीनच्या सुमारास मंदिरातून ‘श्री’ च्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली.यात्रेनिमित्त गुरुशंकर नागुला, ऋतुराज माने व मित्रमंडळींच्या पुढाकाराने मंदिर गाभाऱ्याच्या दर्शनी भागात नारळाच्या पानांची देखणी सजावट करण्यात आली आहे. पालखीलाही नारळाच्या पानांमध्ये नक्षीदारपणे सजविण्यात आले होते. नेहमीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपरिक कानगी प्रसाद घेतला. महिला व पुरुष भजनी मंडळांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.