National Highway-548B : महामार्ग कामामुळे वाहतुकीची कोंडी कायम; सेलूतील नागरिकांतून तीव्र संताप; अपघातात होतेय वाढ
राष्ट्रीय महामार्ग असुनही निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ता होत आहे. संबंधित ठेकेदार आणि सरकारी अभियंतासुद्धा मनमानी पद्धतीने दुर्लक्ष करीत आहेत. गुणनियंत्रण विभागाकडून कामाची सखोल चौकशी केल्याशिवाय देयके काढू नयेत. या कामाबद्दल सेलूतील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. कैफियत मांडण्यासाठी अभियंते दाखवा, बक्षिसे मिळवा, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. – शेख राज, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, परभणी
सेलू जि.परभणी : सेलू शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याचा भाग असलेल्या ५४८ ब या राष्ट्रीय महामार्गावरील कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट क्रॉंकिटकरणाच्या अजब आणि नियोजनशून्य कामाच्या पद्धतीमुळे नागरिक नाहक वेठीस धरले जात आहे. गेल्या वर्षभरापासून साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरुच आहे. एका बाजूचा रस्ता देखील पूर्ण झाला नाही. त्यामुळे प्रंचड धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी, वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
रायगड कॉर्नर, पाथरी-जिंतूर नाका, परभणी रोडवर सतत वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत या मार्गावरील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. ठेकेदाराच्या अभियंत्यांना व मजुरांना हिंदी भाषाही कळत नसल्याने वादविवादांच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ते महामार्ग विभागाचा एकही अधिकारी, अभियंता सेलूत फिरकलाच नाही. नोट कॅमसाठी धावती भेट देऊन काही अभियंत निकृष्ट दर्जाचे कामामुळे नाल्याचे काम जागोजागी ढासळत आहे. अर्धवट कामे, खड्डे, पर्यायी मार्ग, रॅम करून दिले जात नाही. रोषामुळे तत्काळ निघून जातात. नागरिकांच्या समस्या ऐकायला कुणालाही वेळ नाही. रस्त्यालगत खड्डे झाल्याने अनेक वसाहतीतील वाहतूक जिकीरीची झाली आहे. जागोजागी वाहतूक ठप्प होत आहे. सततचे अपघात वाढले आहेत. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्याही नाकीनऊ येत आहेत. रुग्णवाहिकाही तासनंतास अडकून पडू लागल्या आहेत. महामार्ग विभागाचे अभियंते जाणीवपूर्वक या कामाकेड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप केला जात आहे. पादचारी, वाहनधारक कमालीची त्रस्त झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम गुजरातच्या सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. गेल्या चार महिन्यांपासून रायगड कॉर्नर, पाथरी नाका, बसस्थानक, पाथरी रोड, जिंतूर नाका आदी ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे मोठा अडथळा झाला आहे. एका बाजुचा रस्ता देखील वाहतुकीसाठी नीट मोकळा नाही. जालवाहिन्याची कामे अर्धवट झाल्याने रोडलगत मोठ-मोठी खड्डे पडले आहेत. रात्री आणि दिवसादेखील रोडलगतच्या खड्ड्यात दुचाकी, चार चाकी वाहने धडकून अपघात वाढले आहेत. विद्युत केबल, मोबाईल केबलसाठीचे खोदकाम जीवघेणे ठरत आहे. काम गतीने पूर्ण करावे यासाठी विविध पक्ष संघटनांनी नागरिकांनी निवेदने दिली मात्र, ना कामाचा दर्जा सुधारला, ना गती वाढली. या संदर्भात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वेळ लागणार आहे साडेतीन किलोमीटरचे काम आहे. वेळ लागणार आहे. दिवाळीमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. विभागाच्या अभियंत्यांचे लक्ष आहे. काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाणार आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण झाल्यावर उर्वरित कामे गतीने पूर्ण होतील. – अभिजीत घोडेकर, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग