राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकहिताच्या कायद्यांची माहिती सर्वापर्यंत पोहोचवा : डाॅ विलास मोरे
सेलू/परभणी : ग्राहकांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक कायदे केले असून त्यांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी सेलू येथे केले.
सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात तहसील कार्यालय सेलू, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व नुतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महाविद्यालयील विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.महेंद्र शिंदे, प्रमुख पाहुणे तहसीलदार दिनेश झांपले, प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ विलास मोरे, नायब तहसीलदार गजानन इनामदार, स्टेट बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक विजय पाटील, महिला जागरण प्रमुख किरन सोळंके, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालूका संघटक सुनील गायकवाड, सचिव मंजुषा कुलकर्णी, गंगाधर कान्हेकर, प्रा डॉ सुषमा सोनी, अशोक राऊत, सिद्धार्थ गायकवाड, ललीता गिल्डा, जयचंद खोना, एड भुषण गेना, अरुण आढे, सचिन कोरडे, प्रदीप मुनेश्वर आदि उपस्थित होते.
यावेळी डाॅ विलास मोरे म्हणाले की, दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये केंद्र शासनाने अनेक सुधारणा केल्या असून ग्राहकांना व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत. ग्राहकांमध्ये आपले हक्क आणि अधिकारांची जाणिव होण्यासाठी ग्राहक दिनापुरता कार्यक्रम मर्यादित न करता निरंतर त्याविषयी काम झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विजय पाटील म्हणाले, ई- कॉमर्स आणि डिजीटल व्यापाराच्या युगात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. कुणाचीही फसवणूक झाल्यास तात्काळ ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार करावी. डिजीटल समाजामध्ये व्यवहाराबाबत जनजागृती करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे सहकार्य केले जाते. ग्राहक या संकल्पनेची व्याप्ती मोठी असून प्रत्येक नागरिक ग्राहक आहे. कोणतीही वस्तू, सेवा खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी. ग्राहकांना त्यांचे अधिकार व कायद्याची माहिती व्हावी हा या कार्यक्रम साजरा करण्यामागील उद्देश असल्याचे प्रास्ताविकात तहसीलदार दिनेश झांपले यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर तर आभार गंगाधर कान्हेकर यांनी मानले.