वाहन चालक-मालकांचा संप : न्याय संहिता कायद्याविरोधात जोरदार धरणे आंदोलन
परभणी : केंद्र सरकारच्या न्याय संहिता २०२३ च्या कायद्यामध्ये रस्ता अपघात प्रकरणी केलेली १० वर्षे शिक्षा व ७ लाख रुपये दंडाची तरतूद चालकांवर अन्याय करणारी आहे. ती तात्काळ रद्द करावी. या मुख्य मागणीसाठी परभणी जिल्ह्यात वाहन चालक व मालकांनी मंगळवारी कडकडीत संप पुकारला.
लालबावटा वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर संतप्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. ब्रिटीश सरकारच्या पेक्षा घातक पोलीसी राजवट निर्माण करुन विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार वाहन चालक यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप काॅम्रेड राजन क्षीरसागर यांनी केला. इन्शुरन्स, वाहन कर, दंड, टोलनाका यातून चालणारी सरकारी लूट थांबवावी, चालकांना सामाजिक सुरक्षा, व फंड पेन्शनसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे
आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचारास लगाम लावा. चालकांना व व्यावसायिकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. संघटनेचे काॅम्रेड सय्यद अजहर, संदीप सोळुंके, शेख अब्दुल, ओंकार पवार, शिवाजी कदम, अन्वर खान, तोफीक खान, शेख युनूस, बदरगे मामा, अब्दुल रहीमान खान, वहीद खान, संतोष ठाकूर, रामा कुलथे आदींंसह चालक मालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.