Prof. Ganesh Shinde : निसर्ग, समाजासोबत अर्थकारणाकडे लक्ष द्या : प्रा.गणेश शिंदे; विविध पुरस्कारांचे जिंतूरमध्ये वितरण
जिंतूर व्हाईस ऑफ मीडिया व प्रेस क्लबचा उपक्रम, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
जिंतूर जि.परभणी : शब्दांमध्ये प्रचंड ताकद असून शब्दाचे सामर्थ्य ओळखता आले पाहिजे. शब्द जपून वापरावेत शब्दामुळे महाभारत घडले. शब्द हे अनमोल ठेवा असे सांगून युवकांनी निसर्ग, समाजासोबत अर्थकारणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
जिंतूर येथे व्हाईस ऑफ मीडिया व प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त रविवारी, २१ जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण प्रा.शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर हे होते. सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर प्राचार्य श्रीधर भोंबे, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक रवीकिरण चांडगे ,उद्योजक आर.बी.घोडके, प्राचार्य बळीराम वटाणे ,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख , ॲड.विनोद राठोड ,ॲड. मनोज सारडा ,सुधीर शहाणे, सचिन देवकर, अरुण शहाणे ,देवेंद्र भुरे ,सत्यनारायण शर्मा, डॉ. देवराव कराळे ,गजानन देशमुख, मारुती जुमडे, सिद्धार्थ अच्छा, ज्ञानेश्वर मते, लक्ष्मण बुधवंत ,प्रवीण भट आदींची उपस्थिती होती. या वेळी दोन तास गणेश शिंदे यांनी प्रबोधन केले. ते म्हणाले की शब्दांना शेकडो वर्षाचे अधिष्ठान आहे. त्यामुळे शब्द जपून वापरावे. आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण केला तरच मुलावर योग्य संस्कार निर्माण होऊ शकतात. परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आयुष्यात संघर्ष पाहिजे. मुलांना संघर्ष दाखवता आला पाहिजे. मुलांनी निसर्ग, समाज ,अर्थकारण समजून घेतले पाहिजे. राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलावर पालकांनी दडपण टाकू नये. त्यांच्यामध्ये जे चांगले असेल, ते शोधावे तरच खऱ्या अर्थाने येणारी पिढी सशक्त आणि मजबूत तयार होईल. विशेषतः मुलींनी पालकांची मान खाली जाईल, अशी कोणत्याही काम करू नये. पालकाचा जीवनाचा संघर्ष समोर ठेवावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. मनोज सारडा यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस क्लबचे तालुकाध्यक्ष मंचक देशमुख, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण,नेमिनाथ जैन ,प्रशांत मुळी, सचिन रायपत्रीवार, राम रेघाटे, संदीप माहूरकर ,नितीन रोकडे, गुलाबराव शिंदे, संतोष तायडे ,राजू गारकर, दिलीप माघाडे ,राहुल वावळे, नितीन बंगाळे, दिलीप देवकर, शंकर जाधव ,माबूदखान आबासाहेब देशमुख ,राजाभाऊ काळे आदींनी प्रयत्न केले
♦ यांचा झाला गौरव…
विभागीय पातळीवर पुरस्कार वितरणात लोकमतचे उपसंपादक मारुती जुमडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकास वार्ता पुरस्कार तर हिंगोली येथील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी बसंत कुमार भट यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सहकार रत्न पुरस्कार तर उद्योजक आर.बी.घोडके यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
♦ मदतीचा हात…
व्हॉइस ऑफ मीडिया व प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील सचिन रायपत्रीवार, शकील अहमद, शंकर जाधव ,भागवत चव्हाण यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात पत्रकार माबूतखान यांचा अपघात झाल्याने त्यांना आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये तर पत्रकार रामप्रसाद कंटाळे यांना मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.