मुलांनो, चांगले मित्र जोडा : प्रा.डॉ.संतोष मोरेगावकर; सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
सेलू जि.परभणी : जगामध्ये अतिशय वेगाने बदल आणि विकास होत आहे. नवनवे तंत्रज्ञान येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनीही शाळांचे आणि शिक्षणाचे बदलते स्वरूप आत्मसात करून आपल्या जीवनाची प्रगती साधावी. सोबतच आयुष्य समृद्ध बनविण्यासाठी चांगले मित्र जोडणे आवश्यक आहे, असे मत नागपूर येथील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.संतोष मोरेगावकर यांनी येथे व्यक्त केले.
श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरूवारी, एक फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मोरेगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी होते. संस्थेचे सचिव महेश खारकर, संचालक जयंतराव दिग्रसकर, रामेश्वर राठी, मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर,बी.यु.हळणे आदींची उपस्थिती होती. याप्रंसगी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. महेश खारकर म्हणाले की; शैक्षणिक विकासासोबत शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक विकास हा वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमधून होत असतो. विद्यार्थ्यांनी देखील विविध स्पर्धांमधून सहभाग घेऊन आपले भविष्य घडवावे. अध्यक्षीय समारोपात ॲड.अनिरुद्ध जोशी म्हणाले की; श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातून अनेक दर्जेदार विद्यार्थी घडले आहेत. याचे श्रेय शिक्षकांना आहे. शाळेने शिक्षण क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणाचा दर्जा उत्तरोत्तर वाढत जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी डॉ.संतोष मोरेगावकर यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट म्हणून दिले. प्रास्ताविकात बी.यु.हळणे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी, तर आभार दिलीप बेदरकर यांनी केले.
♦विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ सत्रात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी होते. प्रमुख वक्ते म्हणून बालकवी भगवानराव कुलकर्णी उपस्थित होते. संचालक प्रवीण माणकेश्वर,सुरेशराव रोडगे,विष्णुपंत शेरे, अशोकराव फोफसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपाली कुरुडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शुभांगी भाग्यवंत यांनी दिला. आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.