भगवान कुलकर्णी यांच्या ” फुटकं डोरलं ” कथासंग्रहाचे प्रकाशन
सेलू,जि.परभणी : साहित्यिकाला नेहमी लिहिते करणारी वेदना असते. वेदनेतून साहित्यिकाला कथा बीजं मिळत असतात,असे प्रतिपादन देविदास फुलारी यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखक अनुदान प्राप्त कथाकार भगवान कुलकर्णी लिखित “फुटकं डोरलं” या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने २७ जानेवारी रोजी हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी होते. कथाकार राम निकम, कवी प्रा.डॉ.अशोक पाठक, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, कथाकार भगवान कुलकर्णी उपस्थित होते. फुलारी म्हणाले, की स्त्रियांचे दुःख हे शब्दातीत असते, ते कथाकार भगवान कुलकर्णी यांनी कथांमधून मांडलेले आहे. या वेळी राम निकम, अशोक पाठक यांनीही कथासंग्रहावर मत व्यक्त केले. प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड, तर आभार श्वेता जोशी कुलकर्णी यांनी मानले . कार्यक्रमाला साहित्यिक बाबा कोटंबे, कवी मोहन कुलकर्णी, कथाकार राजेंद्र गहाळ आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माधव गव्हाणे, बाळू बुधवंत, निरंजन कुलकर्णी, शितल कुलकर्णी, प्रवीण पांडे, चिन्मय जोशी, शब्द सह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.