‘ज्ञानराधा’, ‘राजस्थानी’चे ठेवीदार आक्रमक; परभणी, सेलू शाखांसमोर आंदोलन, ठेवीदार काढणार महामोर्चा
ज्ञानाराधा मल्टीस्टेटमध्ये मराठवाड्यातील एक लाखांवर ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत, तर राजस्थानी मल्टीस्टेटमध्येही ९०० कोटींच्या ठेवी आहेत. ठेवी परत मिळव्यात यासाठी पाच फेब्रुवारीला बीड येथील मोर्चासमोर ‘ज्ञानराधा’चे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी फोनवरून ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही तर, १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान सुरेश कुटे यांच्या घरावर किमान २५ हजार ठेवीदारांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.- प्रा.सचिन उबाळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड
सेलू जि.परभणी : बीड येथील सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी व परळी वैजनाथ येथील चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखांमधील ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. या मागणीसाठी सोमवारी, १२ फेब्रुवारी रोजी सेलू, परभणी येथील शाखांसमोर सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी जोरदार आंदोलन केले. सेलू येथे ज्ञानराधाचे सहा हजार खातेदार आहेत. गोर गरीब, शेतकरी, कष्टकरी, नागरिक, व्यापारी यांच्या ४२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून प्रक्रियाही पूर्ण करूनही ठेवीदारांना जेरीस आणले जात आहे. ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने शहरी व ग्रामीण भागातील ठेवीदारांनी प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शाखेसमोर आंदोलन केले. शाखा व्यवस्थापक चाळके यांनी नेहमीप्रमाणे फोनवरून आश्वासन दिले. माजी सभापती अशोक काकडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पांठिबा दिला.
▪️आमदार बोर्डीकरांपुढे मांडली कैफियत
‘ज्ञानराधा’सह ‘राजस्थानी’च्या ठेवीदारांनी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सेलू् येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत कैफियत मांडली. बोर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ज्ञानराधा व राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या ठेवी तातडीने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा.सचिन उबाळे, शिवप्रसाद काबरा, श्रीनिवास बाहेती, भरतनाना बोराडे, प्रकाश पाचलेगावकर, केदार कर्वा, जगदीश राठी, ॲड.मुकुंद गजमल आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️तीन महिन्यांत ‘राज्यस्थानी’ला कुलूप
परळी येथील चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेची सुरुवात तीन महिन्यांपूर्वीच सेलू शहरात झाली. अधिक व्याज दराचे आमीष तसेच स्थानिक सल्लागार मंडळातील काही बड्या माणसांची नावे पाहून १५० वर ठेवीदारांनी १ कोटी ३० लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. मात्र दीड महिन्यांपासून बँकेला कुलूप आहे. अध्यक्ष चंदुलाल बियाणी, तसेच व्यवस्थापकांसह कोणीही फोन उचलत नाही. त्यामुळे कोणाकडे दाद मागावी व करावे तरी काय ? याची चिंता लागली आहे, ठेवीदारांचे म्हणणे आहे.
४ लाख ८० हजार रुपये एक महिन्याच्या मुदतीसाठी ठेवले होते. अवघ्या तीन महिन्यांत राजस्थानी सोसायटीने गाशा गुंडाळला. कोणाचाही फोन लागत नाहीत. ‘ज्ञानराधा’सह ‘राजस्थानी’च्या ठेवीदारांना ठेवीचे पैसे तातडीने परत मिळावेत यासाठी प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरूच राहणार आहे. – शिवप्रसाद काबरा, ठेवीदार, सेलू जि.परभणी