‘परभणी ग्रंथोत्सव’चे थाटात उद्घाटन; ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
परभणी : परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परिसरात ‘परभणी ग्रंथोत्सव -२०२४’ चे उद्घाटन शुक्रवारी, २३ फेब्रुवारी रोजी उत्साहात झाले. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय व ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस ग्रंथोत्सव आयोजिण्यात आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, केशव बा.वसेकर, प्राचार्य रामेश्वर पवार, मुख्याध्यापक गोंगे उपस्थित होते. याप्रसंगी लोमटे म्हणाले, ” पुस्तके आपले आयुष्य बदलण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. माणूस म्हणून विकसित व्हायचे असेल, तर ते ग्रंथालयाच्या आणि ग्रंथाच्या माध्यमातूनच शक्य आहे.”
ग्रंथोत्सवामुळे विद्यार्थी आणि वाचकांमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल. वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथोत्सवाची मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गावडे यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने दररोजच्या जीवनात दिवसाला किमान एक-दोन पान वाचन करणे आवश्यक आहे. वाचन चळवळ वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही गावडे यांनी यावेळी केले. नव्या पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रंथांकडे वळविणे आवश्यक आहे, असे श्री.हुसे यांनी नमूद केले. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनांचे उद्घाटन गावडे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक आशिष ढोक यांनी केले. कल्याण वसेकर यांनी आभार मानले. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, वाचन प्रेमी तसेच केंद्रीय विद्यालय, श्री.छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
▪️ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने सकाळी राजगोपालचारी उद्यान परिसरात अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले. दिंडीमध्ये श्री छत्रपती शाहू विद्यालयाचे विद्यार्थी, मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. राजगोपालचारी उद्यान ते जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी ग्रंथोत्सवाचा समारोप आहे. दोन्ही दिवस परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शन, कवी संमेलन, काव्यवाचन, कथाकथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.