छत्रपती संभाजीराजे : घराघरात स्वराज्य उभारणार
छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा निर्धार, परभणी जिल्ह्यात ‘स्वराज्य’ संघटनेच्या शाखांचे उद्घाटन
परभणी : जिल्ह्यातील दयनीय रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचा प्रश्न आदी मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न अजुनही जैसे थे आहेत. याबद्दल चिंता व्यक्त करून, ग्रामीण भागातील माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घराघरात स्वराज्य’ उभारण्यात येणार, असा निर्धार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले शनिवारपासून (१९ नोव्हेंबर) परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गावा गावात जाऊन पूर्णा तालुक्यातील माखणी गावात सजवलेल्या बैलगाडीत बसवून ढोलताशांच्या गजरात, लेझीम पथकासह पुष्पवृष्टी करत पारंपरिक पद्धतीने छत्रपती संभाजीराजे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ताडकळस येथील धानोरा चौक, बसस्थानक परिसरात स्वागतासाठी तरूणांचा मोठी गर्दी उसळली होती. पूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री छत्रपती संभाजीराजे यांची सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.विनय वाघमारे होते. यावेळी प्रवक्ते करण गायकर, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर, स्वराज्य संघटनेचे प्रदेश निमंत्रक गंगाधरराव काळकुटे, धनंजय जाधव, आप्पासाहेब कुडेकर, नितीन देशमुख, राजेश मोरे, गजानन जोगदंड, केशव गोसावी, विनोद साबळे, संजय पवार , साहेबराव कल्याणकर, माधवराव आवरगंड, ज्ञानोबा कदम आदींची उपस्थिती होती.
संभाजीराजे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील जमीन सुपीक आहे. मुबलक पाणी आहे. तरीही शेतकरी आत्महत्या का करतोय याचा शोध घ्यायला हवा. जिल्ह्यात औद्योगिक विकास नाही, खड्ड्यांनी रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय नाही. निवडणुका जात, धर्म याचे धृविकरण करून लढण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर , विकासाच्या मुद्यावर झाल्या असत्या , तर अशी वाईट वेळ आली नसती. तीनशे वर्षानंतरही छत्रपती घराण्यावर आपले असलेले प्रेम पाहून आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार, सहकार, आरोग्य व शिक्षण हे विषय केंद्रबिंदू मानत नवीन पिढी घडविण्याचे काम स्वराज्य संघटना करेल असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधाने करत महापुरुषांची अवहेलना करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून कुठेही घेवून जा अशी पंतप्रधान मोदी यांना साद घातली. जाहीर सभेत ‘राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे’ असा ठराव संमत करण्यात आला. या वेळी तेजस्विनी आवरगंड व भाग्यश्री मोहिते या विद्यार्थीनीनी विचार मांडले. हौसीचित्रकार संतोष सातपुते यांनी रेखाटलेले संभाजीराजे यांचे पेंटींग त्यांनी राजेंना भेट दिले, तर आयोजकांनी बैलगाडीची प्रतिकृती व संत जनाबाईची प्रतिमा देत स्वागत केले. प्रास्ताविक साहेबराव कल्याणकर, सूत्रसंचालन जगदीश जोगदंड, तर प्रा.पुंडलिक जोगदंड यांनी मानले. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून संभाजीराजे भोसले सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तसेच स्वराज्य संघटनेचे मोट बांधण्यासाठी गावागावात जाऊन शाखा स्थापन करीत आहेत.
वादग्रस्त विधाने करत महापुरुषांची अवहेलना करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातून कुठेही घेवून जावे, अशी संभाजीराजे भोसले यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. तर जाहीर सभेत ‘राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे’ असा ठराव संमत करण्यात आला.
हेही वाचा : जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा
हेही वाचा : VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख