विचारवंत : नरहर कुरुंदकरांवरील नाटकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा पुढाकार, विविध प्रसंगांनी प्रेक्षकांना ठेवले खिळवून
सेलू,जि.परभणी : प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा विलक्षण जीवनप्रवास साभिनय अभिवाचनातून उलगडणाऱ्या ‘नरहर कुरुंदकर – एका विचारवंतांची अपरिचित गोष्ट’ या अनोख्या नाट्यप्रयोगाला सेलूतील रसिक, प्रेक्षकांनी सोमवारी (२१ नोव्हेंबर) भरभरून प्रतिसाद दिला.
नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित (कै) श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेच्या वतीने हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त या नाट्यप्रयोगाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता सेलू येथील साई नाट्यगृहात नटराज पूजनाने नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिरादार, प्रा.अजय अंबेकर, प्रा.ए.डी.कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. धर्म, समाजजीवन, साहित्य, कला, इतिहास आदी विषयांवरील तर्काधिष्ठित आणि परखड मांडणीसाठी ते ओळखले जात. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण. बुद्धिप्रामाण्यवादातून आलेला त्यांचा सडेतोडपणा आणि त्यातही त्यांनी न सोडलेले ‘माणूसपण’ आदी बाबींचा वेध घेणार्या प्रसंगांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुमारे दोन तासांच्या मांडणीतून कुरुंदकरांचे वैविध्यपूर्ण पैलू उलगडतात.अंतर्मुख करतात. भक्कम संहितेसह कल्पक रेखाचित्रे, समायोजित पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि वाचक अभिनय यांसह हा प्रयोग फुललेला दिसून येतो. नाटकाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन प्रा.अजय अंबेकर यांचे असून द.वा. जोग, पत्रकार, मधू, रामराव या भूमिकाही त्यांनी साकारलेल्या आहेत. निर्माती आणि सूत्रधार ज्योती अंबेकर यांनी शिक्षिका, दिलीप पाध्ये यांनी ताकदीने उभे केलेले नरहर कुरुंदकर प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करून जातात. राजीव किवळेकरांचे शास्त्री, प्रोफेसर रामलाल, कहाळेकर महाराज, ज्योती पाध्येंच्या आई आणि प्रभावती, शुभंकर देशपांडेंने छोटा नरहरी या सर्वांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. समन्वयक सोहम पिंगळीकर यांनी तंत्रज्ञानाची बाजू सांभाळली आहे. मयुर सरकाळेंचु प्रकाश योजना, शर्वरी पांडेंचे चित्र संयोजन, दिव्या कुलकर्णींघे ध्वनी संयोजन, शुभम हुलसुरे यांची रेखाचित्रे, तर प्रशांत ठाकरे यांचे पार्श्वसंगीत नाटकाला साजेसे आहे. नाटकाला संस्थेचे सदस्य, नाट्य कलावंत, रसिक प्रेक्षक, श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी संयोजक डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.ए.डी.कुलकर्णी, गिरीश लोडाया, डॉ.महेंद्र शिंदे, नारायण सोळंके, संगीता खराबे, संतोष कुलकर्णी, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, संतोष पाटील, अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, सुरेश हिवाळे, किशोर विश्वामित्रे, प्राचार्य एन.पी.पाटील, सुखानंद बेंडसुरे, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, बन्सीलाल पद्मावत, बालाजी देऊळगावकर, कैलास मलवडे, प्रा.के.के.कदम, प्रा.देविदास ढेकळे, उल्हास पांडे, डॉ.प्रवीण जोग, ऊषा साळेगावकर आदींसह संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
काही प्रसंगांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले. दोन अंकी नाट्यप्रयोग सुजाण समाज निर्माण करण्याचा संदेश देतो. एकेक प्रसंग नरहर कुरुंदकरांच्या जीवन आणि चिंतन, विचार शैलीतील विविध पैलू उलगडून दाखवतो. विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे कुरुंदकर यांचा बुद्धीवाद हा टोकाचा नव्हता. याचे प्रकर्षाने दर्शन घडते. नव्या पिढीला प्रेरित करणारे, जुन्या पिढीच्या चिंतन, आठवणींना उजाळा देणारे कुरुंदकरांवरील ही नाट्य कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे
.
हेही वाचा : घराघरात स्वराज्य उभारणार : छत्रपती संभाजीराजे
हेही वाचा : VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख
हेही वाचा : जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा