वालूरात रंगला ‘मराठवाडी बोली बोलु कवतुके’चा स्नेहमेळावा
जात्यावरील ओव्यांनी वेधले लक्ष, मान्यवरांची उपस्थिती.
सेलू जि.परभणी : तालुक्यातील वालूर येथे ‘मराठवाडी बोली बोलू कवतुके’ व्हाट्सअप सदस्यांच्या रविवारी (१६ एप्रिल) स्नेहमेळावा झाला. या वेळी बोलतांना नाटककार तथा ज्येष्ठ भाषा अभ्यासक रवींद्र इंगळे चावरेकर म्हणाले, की भाषा ही जगातील अत्यंत सामर्थ्यवान गोष्ट आहे. भाषेच्या संकलनामुळेच मानवांचा विकास होतो. त्यामुळे बोली भाषेचे शास्त्र विकसित होणे गरजेचे आहे.
अध्यक्षस्थानी ‘दैनिक सकाळ’च्या मराठवाडा आवृतीचे निवासी संपादक दयानंद माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संतोष बोंढारे, डॉ.संजय लोंढे, तानाजी भोसले, प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे आदींची उपस्थिती होती. चावरेकर म्हणाले, की सर्व भेदाभेद विसरून हा बोली भाषेचा ग्रुप संवाद साधणारा आणि भाषेला खऱ्या अर्थाने जपणारा ग्रुप आहे. लिपी आणि भाषा मोठी शस्त्रे आहेत. भाषेचे खरे शास्त्र त्याच बोली भाषेत आहे. बोलीभाषा आकारास येत असल्यामुळे बोलीचे शास्त्र आणि दर्जा आता अधोरेखित होत आहे. अध्यक्षीय समारोपात माने म्हणाले की, आजच्या सोशल मीडियाच्या काळात एका बोलीभाषेसाठी काम करणारा ‘ मराठवाडी बोली बोलू कौवतुके’ समूह महत्त्वाचे योगदान देत आहे. या कुटुंबातून येणारी भाषा सृजन आणि सामर्थ्यवान आहे. प्रारंभी शेतकरी विठ्ठलराव खटिंग, सालदार दिगंबर साखरे, रंगराव भिसे, दिमडी वादक लक्ष्मणराव भिसे आणि लेखक व पाच हजार बोली भाषेचे शब्द संग्रह करणारे छबुदास भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.केशव खटिंग, सूत्रसंचालन बबनराव गिनगिने यांनी केले, तर संगीता देशमुख यांनी आभार मानले. शिवाजी अंबुलगेकर,शरद ठाकर अरुण चव्हाळ, कवी सुरेश हिवाळे,अशोक उफाडे, माऊली देशमुख, प्रभू शिंदे, डॉ.अशोक पाठक,डॉ. सतीश मगर, शिवदास पोटे आदींनी पुढाकार घेतला. मेळाव्याच्या निमित्ताने महिलांनी गायलेल्या जात्यावरील ओव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
अध्यक्षीय समारोपात ‘सकाळ’चे निवासी संपादक दयानंद माने म्हणाले, “आजच्या सोशल मीडियाच्या काळात एका बोलीभाषेसाठी काम करणारा हा ‘ मराठवाडी बोली बोलू कौवतुके’ समूह महत्त्वाचे योगदान देतो आहे. मोबाईलच्या या काळात जगात रोज एखादी भाषा मरतेय अशा काळात भाषेसाठी कार्य करणे महत्त्वाचे पाऊल आहे. सगळ्या गोष्टींची सुरुवात प्रेमातून होते. त्यामुळे भाषेवर, माणसावर, या भूमीवर प्रेम करा म्हणजे राष्ट्र उभे राहील. “
सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
साईबाबा बँकेला 3 कोटी 43 लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; ठेवी 200 कोटींच्या घरात