SSC Results : सेलूतील तब्बल १७ शाळांचे निकाल घसरले; गुणवत्ताही आटली 

SSC Results : सेलूतील तब्बल १७ शाळांचे निकाल घसरले; गुणवत्ताही आटली 

शैक्षणिक मंथनाची गरज, विद्यार्थ्यांचे मानसिक बळ वाढविण्याची आवश्यकता 

Authored By Babasaheb Helaskar 

सेलू जि.परभणी : शैक्षणिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणाऱ्या सेलू शहरासह तालुक्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद शाळांचा इयत्ता दहावीचा यंदाचा सरासरी निकाल गतवर्षीच्या तुलनेत (२०२२) ४.७८ टक्क्यांनी घटला आहे. ३० पैकी तब्बल १७ शाळांचे निकाल घसरले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही कमालीची घसरण झाली आहे. निकालामध्ये परभणी जिल्ह्यात सेलू तालुका आठव्या क्रमांकावर आहे.

सेलू शहर व तालुक्यातील एकूण ३० शाळांचे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. २०२२ मध्ये २३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१२३ (९२.२६ टक्के) उत्तीर्ण झाले होते. यंदा २०२३ मध्ये २२०६ पैकी १९३० (८७.४८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का ४.७८ इतका घसरला आहे.

…या शाळांचा निकाल घसरला

सेलू येथील नूतन कन्या प्रशालेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४.६५ टक्क्यांनी घसरला आहे. ३४३ पैकी ३१२ ( ९०.९६ टक्के ) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षी हे प्रमाण ९५.६१ टक्के इतके होते. न्यू हायस्कूलचे ६५ पैकी ४७ ( ७२.३० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपेक्षा (९७.२६‌ टक्के) निकाल होता. २४.९६ टक्क्यांनी घसरला आहे. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये ३७ पैकी २७ ( ७२.९७) विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. गतवर्षी १०० टक्के निकाल होता. यंदा २७.०३ टक्क्यांनी घटला आहे. शारदा विद्यालयाचे २७ पैकी ९ (३३.३३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी ९३.९३ टक्के निकाल होता. त्यात ६०.६ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे ५९ पैकी ४४ ( ७४.५७ टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी ७५ टक्के निकाल होता. देऊळगाव गात जिल्हा परिषद प्रशालेच्या ३७ पैकी ३५ (९४.५९ टक्के) विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. निकालात ०.४८ टक्के घट झाली. गुगळी धामणगाव जिल्हा परिषद प्रशालेतील १२ पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८३.९३ टक्के निकाल आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ६.६९ टक्क्यांनी तो घटला आहे. गतवर्षी शंभर टक्के निकाल असणार्‍या शाळांमध्ये कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयाचे ८२ पैकी ७३ ( ८९.०२ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा १०.९८ टक्क्यांनी घटला आहे. चिकलठाणा येथील नेताजी सुभाष विद्यालयात ३३ पैकी ३२‌ ( ९६.९६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. ३.०४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या २७ पैकी २२ मुली उत्तीर्ण झाल्या. निकाल ८१.४८ टक्के आहे. गतवर्षी १०० टक्के होता. यंदा तो १८.५२ टक्क्यांनी घटला आहे, तर देवगावफाटा येथील सौ.शांताबाई नखाते विद्यालयाचे १३६ पैकी १२९ ( ९४.८५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा निकाल १.७३ टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षी ९६.५८ टक्के होता. आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात ६६ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ७५.७५ टक्के आहे. गतवर्षी ९८.४३ टक्के होता. यंदा २२.६८ टक्के इतका घसरला आहे. डिग्रस जहांगीरच्या क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाचे ५६ पैकी ५१ विद्यार्थी ( ९१.०७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. निकाल १.७८ टक्के किंचितसा घटला आहे. मोरेगावच्या पांडुरंग विद्यालयाचे ५३ पैकी ५२ (९८.११ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी निकाल ९८.१४ टक्के होता. शिंदे टाकळी येथील ज्ञानोदय माध्यमिक शाळेचे ५३ पैकी ४५ ( ८४.९० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत (९७.०१) १२.११ टक्क्यांनी घटला आहे. वालूरच्या वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात ३९ पैकी ३३ ( ८४.६१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पण, गतवर्षीच्या तुलनेत (९८.४३ टक्के) १३.८२ टक्क्यांनी निकाल कमी झाला आहे. खान अब्दुल गफार खान उर्दू हायस्कूलमध्ये २७ पैकी २६ (९६.२९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी निकाल १०० टक्के होता. यंदा ३.७१ टक्क्यांनी कमी झाला. यासेर उर्दू हायस्कूलचे ४७ पैकी ३५ ( ७४.४६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याही शाळेचा गतवर्षीचा निकाल १०० टक्के होता. यंदा तो २५.५४ टक्क्यांनी घटला आहे. सेलूतील ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.४६ टक्के आहे. ७९ पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी निकाल ९८.५० टक्के होता. यंदा १.०४ टक्क्यांनी कमी झाला. ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.४६ टक्के आहे. ७९ पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी निकाल ९८.५० टक्के होता. अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेतील २० पैकी १४ (७० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा निकाल ३० टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षी निकाल १०० टक्के होता.

…या शाळांच्या निकालात झाली वाढ 

सेलूतील नूतन विद्यालयातून सर्वाधिक ४५५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३८३ उत्तीर्ण (८४.१७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत नूतन विद्यालयाचा निकालात (८१.९६ टक्के) २.२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यशवंत विद्यालयाचे १०२ पैकी ९२ ( ९०.१९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी निकाल ८८.४९ टक्के होता. यंदा १.७ टक्क्यांनी वाढला. माऊलीनगरातील यशवंत विद्यालयाचे ४३ पैकी ४१ (९५.३४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपेक्षा १.८ टक्क्यांनी वाढला आहे. वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक आश्रमशाळेच्या १५५ पैकी १४० (९०.३२ टक्के) विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ०.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमनताई केंद्रीय निवासी शाळेचा गतवर्षीचा निकाल शून्य टक्के होता. यंदा १०० टक्के आहे. दोन पैकी दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नूतन इंग्लिश स्कूलचा निकाल यंदा ४.७७ टक्क्यांनी वाढला आहे. १७ पैकी १७ (१०० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शंभर टक्के निकालाची परंपरा  

व्हिजन इंग्लिश स्कूलचे ३९ पैकी ३९, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचे ३८‌ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही शाळांसह वालूर येथील जिल्हा परिषद प्रशालेनेही यंदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.‌ २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवत्तेत घसरण

मार्च २०२२ मध्ये ७०७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली होती. यंदा ही संख्या ४६० ( ९.८७ टक्के) इतकी खाली आली आहे. ग्रेड एक मध्ये ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हा आकडा घसरुन ६०३ वर ( ५.६९ टक्के) घसरला आहे. ग्रेड दोन मध्ये देखील ५.२९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गतवर्षी ७८४ विद्यार्थी ग्रेड दोन मध्ये उत्तीर्ण झाले होते. यंदा ६३४ विद्यार्थी या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दोन वर्ष करोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची भावनिक मानसिकता मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. ही पोकळी करोनानंतर भरून निघणे जिकिरीचे ठरले. मूळ संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत. शिवाय अनामिक भिती, खालावलेला आत्मविश्वास आणि अस्थिर मानसिकतेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला. यातून गुणवत्ता जरी घसरली असली, तरी विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्यासाठी वेगळे उपक्रम शाळांमधून हाती घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने मंथनाची देखील गरज असल्याचे मत शैक्षणिक, सामाजिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.


नूतन विद्यालयाची ‘ धनश्री ‘ सेलू तालुक्यातून अव्वल; वैद्यकीय क्षेत्रात करणार करिअर

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!