कायद्याचा धाक राहिलेला नाही : सेलूतील कार्यक्रमात नंदिनी चपळगावकर यांचे मत

कायद्याचा धाक राहिलेला नाही : सेलूतील कार्यक्रमात नंदिनी चपळगावकर यांचे मत

सेलू महिला मंडळाच्या वतीने चिन्मयी सुमित यांना गीताबाई चारठाणकर पुरस्काराचे वितरण

Authored By Shripad Kulkarni

सेलू : संपूर्ण देशात महिलांवर अन्याय होताना सभोवताली असणारे लोक त्याचे पूर्ण चित्रीकरण करतात. व्हिडिओ काढतात. मात्र, त्या महिलेच्या मदतीसाठी कोणीही धावून जात नाही. ही अतिशय चिंतनीय बाब आहे. यातूनच स्पष्ट दिसते की, देशात व राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे परखड मत छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजिका नंदिनी चपळगावकर यांनी सेलू येथे व्यक्त केले.

सेलू (जि.परभणी) येथील महिला मंडळाच्या वतीने‌‌ शुक्रवारी,१६ जून रोजी सायंकाळी आयोजित ‘वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार’ वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात नंदिनी चपळगावकर बोलत होत्या. नूतन विद्यालयातील राजेंद्र गिल्डा सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुण्या प्रा.स्नेहल पाठक (माजलगाव), महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, चिटणीस ललिता गिल्डा, वर्षा डोंग्रजकर, वरुणा चारठाणकर आदींची मंचावर उपस्थिती होती. मराठवाडा पातळीवर शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या एका भगिनीला दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे २९ वे वर्ष आहे. २०२३ या वर्षीच्या पुरस्काराने सिने-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, पुष्पहार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख पाच हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्काराला उत्तर देताना चिन्मयी सुमित म्हणाल्या, की गीताबाई चारठाणकर (माई) यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रसन्नता. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. सेलूकरांनी पाठीवर टाकलेली ही थाप खूप मोलाची आहे. मराठवाडा ही समृद्ध भूमी आहे. संतांची भूमी आहे. आमची भाषा खूप समृद्ध आहे. मराठवाड्याबद्दल मला नितांत आदर आहे. मराठवाड्याचा मुक्ती संग्राम सुरू होता. त्या काळात आपल्याकडे शिक्षण सुरू होते. आपल्याकडे शिक्षण मातृभाषेत मिळत नव्हते, त्यावेळी आम्ही त्यासाठी लढा दिला. मातृभाषेत शिक्षण उपलब्ध व्हावे . यासाठी झगडलो आणि आज मातृभाषेत शिक्षण मिळत असताना, आपण सर्व वेगळीकडे आकर्षित होत आहोत. याची खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

महिला सुरक्षिततेची सुरुवात कुटुंबापासून‌ : प्रा.स्नेहल पाठक

आज महाराष्ट्रासह देशभर आपण पाहिले, तर महिला खूप असुरक्षित वाटतात. कोठेही कायद्याचा धाक दिसत नाही. सगळीकडे विकृत माणसं वावरत आहेत. याबद्दल खूप वाईट वाटते. कारण महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे, असे मत प्रा.स्नेहल पाठक यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या , की महिला घराचे घरपण राखणारु प्रमुख स्तंभ असते.‌ हे माहीत असताना देखील महिलावर अन्याय वाढलेला दिसतोय. महिलांची सुरक्षितता, सामाजिक प्रश्न,जबाबदारी या सर्वांची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे. शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, सुरक्षितता महत्त्वाची आहे .कारण स्त्री हा सृजनाचा स्त्रोत आहे. कौटुंबिक विचार केला, तर नकळत भेदभाव केला जातो. जन्मापासूनच कुटुंबात भेदभाव होतो. हा भेदभाव टाळून महिलांमध्ये सक्षमता येण्यासाठी कुटुंबात सुरुवातीपासूनच समानतेचे वातावरण ठेवले पाहिजे. त्यात संस्कार महत्त्वाचे आहेत.‌ सोशल माध्यम असो, किंवा दूरचित्रवाणी असो यावर चांगलेच पाहिले पाहिजे असेही प्रा.स्नेहल पाठक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. अनघा पांडे यांनी स्वागतगीत गायीले. मीना चौधरी व सरिता उमरीकर यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर महिला गीताबाई चारठाणकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित शौर्यगीत तथा पोवाडा सादर केला. पाहुण्यांचा परिचय करुणा बागले, शैलैजा अंबेकर, सरिता उमरीकर यांनी करून दिला. वरूणा कुलकर्णी चारठाणकर यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. प्रास्ताविक चिटणीस ललिता गिल्डा यांनी केले. सूत्रसंचालन मीरा देशमुख , तर कांचन बाहेती यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुरा खारकर, संगीता खारकर, रजनी सुभेदार, अनुपमा देवधर, सुरेखा वांभुरकर, सुनंदा आनंदगावकर, शीला दीक्षित, भारती खोना, मीना देशमुख, शुभदा चारठाणकर, मंजुषा सेलगावकर, प्राची चारठाणकर, मनिषा फंड, मेधा चौधरी, हेमा जोशी, सुरेखा चारठाणकर, कमलीनी डोंग्रजकर, वर्षा चारठाणकर आदीसह महिला मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. अलका धर्माधिकारी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी महिलांची मोठी उपस्थिती होती.

मी औरंगाबादच म्हणणार : चिन्मयी सुमित

सत्काराला उत्तर देताना चिन्मयी सुमित यांनी औरंगाबाद शहराचा संदर्भ देताना, मी या शहराला कदापिही छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, तर औरंगाबाद असेच म्हणणार असल्याचे मत परखडपणे व्यक्त केले. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून, असे परखड मत व्यक्त करण्यामागची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ” ते माझे वैयक्तिक मत असून, मला जे चांगले वाटेल, तेच मी स्वीकारेल. राजकीय मंडळींनी हिंदुत्व अथवा नावातील बदलामध्ये स्वतःचा व समाजाचा वेळ घालवण्यापेक्षा नागरिकांशी निगडित जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, केवळ शहराच्या नामांतरात नागरिकांना अडकून ठेवणे माझ्या मनाला पटत नाही. म्हणून मी कायम या शहराला औरंगाबाद असेच संबोधणार असल्याची भूमिका चिन्मयी सुमित यांनी व्यक्त केली.


चिन्मयी सुमित यांना चारठाणकर पुरस्कार प्रदान; सेलूतील महिला मंडळाचा उपक्रम

सेलूतील शुभम टाके यांचे नेट परीक्षेत यश; इंग्रजीमध्ये ९६.०६ पर्सेंटाइल

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!