उलगुलानवेध साहित्य संमेलन : भटक्या विमुक्तांच्या साहित्याला नव्या वाङ्मयीन जाणिवांचे रूपडे : ज्येष्ठ कवी प्रा.विश्वास वसेकर यांचे मत 

उलगुलानवेध साहित्य संमेलन : भटक्या विमुक्तांच्या साहित्याला नव्या वाङ्मयीन जाणिवांचे रूपडे : ज्येष्ठ कवी प्रा.विश्वास वसेकर यांचे मत 

पुण्यात पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे : भारतीय संविधानाने या देशातील तळागाळातला,  जंगला- रानातला माणूस जागा झाला. भारतीय राज्यघटनेने या देशातल्या आदिवासी – दलित आणि भटक्या विमुक्तांना खऱ्या अर्थाने माणूसपण बहाल केले. मात्र, धूर्त, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत अजूनही नीट पोहचू दिले नाही. आदिवासी साहित्य, भटक्या विमुक्तांचे साहित्य या केवळ संज्ञासंकल्पना राहिल्या नाहीत तर त्यांना नव्या वाङ्मयीन जाणिवांचे रूपडे प्राप्त झाले आहे. त्या नव्या वाङ्मयीन प्रवृत्ती बनल्या. कथा, कादंबरी, कविता, नाटक यांमधून त्या आविष्कृत व्हायला लागल्या आहेत, त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. असे मत पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांनी व्यक्त केले. 

आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १८ जून रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. उलगुलान या शब्दाचे प्रतीक असलेली मशाल आणि हाकुमी हे आदिवासी वाद्य हातात देऊन पाचव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांच्याकडे संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.

या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, नागपूरचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. वि.स. जोग, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष  प्रा. डॉ. विनायक तुमराम, विदिशा विचार मंच, पुणेच्या  ममता क्षेमकल्याणी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संभाजी मलघे, प्रा.डॉ. भौमिक देशमुख, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे सचिव सुनील कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, नक्षलवादी आणि पोलीस यांच्या दहशतीत आदिवासींचा वनवास चालू आहे. त्यांना मध्यवर्ती प्रवाहात सामील करून घ्यायला हवे. यासाठी कला, साहित्य, निसर्ग आणि निसर्ग प्रेमाचा आदिवासींचा वारसा जपला पाहिजे, कारणे  ते आपल्यापेक्षा समृद्ध आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीला उज्वल भवितव्य प्राप्त करून देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर बेगडी संस्कृती लादण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. त्यांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून तोडले जात असून त्यांना त्यांचे मानवतेचे तत्व सोडण्यास भाग पाडले जात आहे. नागरी संस्कृतीने शिकावी, अशी आदिवासींची मूळ संस्कृती आहे.

प्रा.डॉ. विनायक तुमराम म्हणाले की, आदिवासींची वेदना आणि शोषण त्यांच्या साहित्यातून पुढे यावे, म्हणून ही धडपड सुरू आहे. आदिवासी हा या भूमीचा मूळ पुरूष असून त्यालाच आज हद्दपार केले जात आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासींचे योगदान दुर्लक्षले गेले, याची खंत न बाळगता आदिवासींनी त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान कायम जागृत ठेवला. अस्मिता आणि अस्तित्वासाठी आम्ही झगडत आहोत.

या वेळी प्रा. डॉ. वि.स. जोग , विदिशा विचार मंच च्या  ममता क्षेमकल्याणी, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे सचिव सुनील कुमरे यांनी केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संभाजी मलघे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले, तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष  प्रा.डॉ. भौमिक देशमुख यांनी आभार मानले.


चिन्मयी सुमित यांचा चारठाणकर पुरस्काराने गौरव ; सेलू महिला मंडळाचा उपक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!