प्रेरणादायी : सेलू तालुक्यातील चारशे गुणवंतांचा सन्मान; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम
मान्यवरांसह विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती
सेलू : दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू तालुक्यातील दहावी, बारावी, जेईई, वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेतील चारशेहून अधिक गुणवंत; तसेच इस्रोवारी केलेल्या जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांचा मंगळवारी (२० जून) सन्मान करण्यात आला.
सेलू (जि.परभणी) येथील साई नाट्य मंदिरात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर होते. संयोजक आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे, प्रा.विठ्ठल कांगणे, डॉ.संजय रोडगे, संगीता खराबे, नारायण साोळंके, दिनकर वाघ, संतोष कुलकर्णी, पी.एस.कौसडीकर, कपील फुलारी, ॲड.दत्ता कदम, संजय लोया आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कवी प्रशांत मोरे म्हणाले की, शिक्षण काळानुसार वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहे.पण, बदलत्या शिक्षणात आपण, आपली नाती विसरून जात आहोत. अमानुषपणे वागत आहोत. माणसाला भानावर राहून आपली प्रगती करावी लागेल. आपण ज्या भागामधून आलेलो आहोत. त्या ठिकाणचे प्रश्न आपण सोडविले पाहिजे. आपण कितीही गुणवंत, यशवंत, कीर्तीवंत झालो तरी आपले आई-वडील, आपला समाज आपलं कर्तव्य याचा विसर आपल्याला कधीही पडू नये, असे मोरे म्हणाले. मोरे यांनी सादर केलेल्या काव्यरचनांनी उपस्थित भारावून गेले.
प्रा.कांगणे म्हणाले, ” सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी त्या अडचणी आसमानी असतात, तर सुलतानी. परंतु, यामधून जो विद्यार्थी मार्ग काढतो. तोच यशस्वी होतो. अडचणी आहेत म्हणून रडगाणं गात बसू नका. रडगाण गात बसणारा विद्यार्थी कधीही यशस्वी होणार नाही. जो संघर्ष करतो तोच आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकतो. प्रास्ताविकातून दीपस्तंभ प्रतिष्ठान संस्थापक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीचा आढावा मांडला. दीपस्तंभ प्रतिष्ठान मार्फत विद्यार्थी, शिक्षक, शेती, आरोग्य आणि त्यातून तयार होणारे सामर्थ्य हे जपण्याचे काम दीपस्तंभ प्रतिष्ठान वेळोवेळी करत आहे. विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींना आपण सोडवणूक करावी या हेतूने प्रतिष्ठान कार्यरत आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणीजनांचा सन्मान, गरजूंना मदत केली जाते. एक पथदर्शक काम प्रतिष्ठान करत आहे.” प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
सूत्रसंचालन अमोल निकम यांनी केले. मुख्याध्यापक शिवाजी खिस्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गुलाब ताठे, अंभुरे, संदीप बोकन, दत्ता पवार , प्रकाश शेरे, बाळू काजळे, अनिल मेटांगळे आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
” विद्यार्थी, शिक्षक, शेती, आरोग्य आणि त्यातून तयार होणारे सामर्थ्य जपण्याचे पथदर्शक कार्य दीपस्तंभ प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यामातून महाराष्ट्रात एक सामाजिक विचारमंच तयार होत आहे ..” – आमदार मेघना बोर्डीकर