Jalna-Nanded Highway : शेतकऱ्यांचे मुंबईत जोरदार सत्याग्रह आंदोलन; जमीनीचा बाजारभावाने मोबदला देण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी गाडी पाठवून बोलणीसाठी शिष्टमंडळास विधानभवनात केले आमंत्रित
परभणी : ‘जालना-परभणी-नांदेड महामार्गा’साठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीसाठी बाजारभावाने व गुणांक दोन वापरून पाच पट मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी (२६ जुलै) जोरदार सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
महामार्ग बाधित शेतकरी कृती समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली सकाळी साडे दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास आंदोलन स्थळी सभा झाली. या वेळी परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आशा श्यामसुंदर शिंदे,
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉम्रेड राजन क्षीरसागर, रामेश्वर गाडेकर, माजी सभापती अशोक काकडे आदींसह कृती समितीच्या निमंत्रकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जुनाट व कालबाह्य कायद्याच्या आधारे शेतकऱ्यांची लूट चालू देणार नाही. तुमची समृद्धी आणि शेतकऱ्यांवर बरबादी लादणाऱ्या आणि कवडीमोल भावाने जमीन लुबाडणाऱ्या नांदेड-जालना समृद्धीमहामार्गाच्या संपादित जमिनीसाठी दहा पट मोबदला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी राजन क्षीरसागर यांनी या वेळी केली. आमदार वरपुडकर यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद केले.
दुपारी साडेतीन वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शिष्टमंडळाशी विधानभवनात चर्चा करून निवेदन स्वीकारले. संपादित जमीन अत्यंत सुपीक व बागायती आहे. त्यामुळे बाजारमूल्य ठरविण्यासाठी जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाप्रमाणे शासनस्तरावरून समिती गठीत करावी, महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी ३ मीटर ऐवजी १५ मीटरचा शेतरस्ता पूर्वी संपादित जमिनीतूनच द्यावा, जमिनीमध्ये केळी, ऊस व फळझाडे अशी पिके असल्यामुळे फक्त पीक पेरे न पाहता सिंचनाचे संसाधने व लाभक्षेत्र तपासून बागायत व निमबागायत अशी वर्गवारी करून मूल्यांकन करावे, भूसंपादन व पुनर्वसन अधिनियम २०१३ मधील कलम २६ ते ३० प्रमाणेच करावे, संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे नोंद करून घेतलेले परिशिष्ट १६ अंतीम करून योग्य मोबदला द्यावा. आदी विविध मागण्यांचा निवेदनात दरम्यान, या संदर्भात पुढील आठवड्यात महामार्ग कार्यक्षेत्रातील सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात येईल व मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात कॉम्रेड राजन क्षीरसागर, रामेश्वर गाडेकर, विठ्ठल धस, संदेश देसाई, सुधीर देशमुख, गजानन हंबर्डे, गोविंद घाटोळ, शिवाजी चोपडे, अशोक रन्हेर, विजय खरात, परमेश्वर उबाळे आदींसह परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातील दोन हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मुसळधार पावसातही वॉटरप्रुफ मंडपात सत्याग्रह आंदोलन सुरू होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी गाडी पाठवून सहा सदस्यीय शिष्टमंडळास विधानभवनात आमंत्रित केले. या वेळी झालेल्या बैठकीस आमदार राहुल पाटील, आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते.
प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे यांचे निधन; छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास