मराठवाडा मुक्तीसंग्रामात सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण : डॉ.बी.जी.कुलकर्णी
परभणीच्या शारदा महाविद्यालयात कार्यक्रम
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव, शारदा महाविद्यालय रौप्य महोत्सव व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बी.जी.कुलकर्णी म्हणाले, की स्वामी रामानंद तीर्थ यांनी सर्वसामान्यांच्या मदतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा प्रखर करून स्वातंत्र्य मिळवून दिले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्यामसुंदर वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.जी.कुलकर्णी तसेच; मुख्याध्यापक नितीन जैस्वाल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉ.संतोष नाकाडे, समन्वयक प्राध्यापक डॉ. अविनाश पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बी.जी.कुलकर्णी म्हणाले की, इंग्रज व निजाम सरकारने येथील जनतेवर अत्याचार करतांना, समान धोरण राबवले व येथील सर्वसामान्य जनतेचा अनन्वित छळ केला. या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ यांनी सर्वसामान्यांच्या मदतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा प्रखर करून स्वातंत्र्य मिळवून दिले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वाघमारे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा सविस्तर परिचय दिला. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.सचिन खडके, प्रास्ताविक डॉ. अविनाश पांचाळ, तर प्राध्यापक डॉ.सुनील बल्लाळ यांनी आभार मानले. प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.