मुक्तिसंग्रामातील राष्ट्रीय शाळा धगधगत्या अग्निज्वालाच : सुरेश हिवाळे
सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमाले तिसरे पुष्प
सेलू जि.परभणी : हैदराबाद संस्थानात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकार आणि प्रेरणेने मराठवाड्यात स्थापन झालेल्या नूतन विद्यालयासारख्या राष्ट्रीय शाळांनी समर्पित भावनेने देश सेवा करणारे राष्ट्रनिष्ठ कार्यकर्ते घडविले. या राष्ट्रीय शाळा म्हणजे स्वातंत्र्याचे यज्ञकुंड तेवत ठेवणाऱ्या अग्नीज्वालाच होत्या, असे मत कवी, तथा शिक्षक सुरेश हिवाळे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव व्याख्यानमालेत मंगळवारी, सहा सप्टेंबररोजी ‘ हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील शिक्षण संस्थांचे योगदान ‘ या विषयावर हिवाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.गंगाधर गळगे होते. सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ मराठवाड्यातील ग्रंथालय, व्यायाम शाळा आणि राष्ट्रीय शाळांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाचं योगदान दिले आहे. मातृभाषा मराठीतून शिक्षण मिळावे. सामाजिक, राजकीय, आर्थिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त व्हावे. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे. या हेतूने राष्ट्रीय शाळा, हिप्परगा, नूतन विद्यालय, सेलू, सोबतच आंबेजोगाई, परभणी, औरंगाबादसह मराठवाड्यात राष्ट्रीय शाळा स्थापन करण्यात आल्या. या राष्ट्रीय शाळा म्हणजे स्वातंत्र्याचे यज्ञकुंड तेवत ठेवणाऱ्या अग्नीज्वालाच होत्या.’ असेही सुरेश हिवाळे म्हणाले. डॉ. गंगाधर गळगे अध्यक्षीय समारोपत म्हणाले की, ‘ मराठवाड्यातील राष्ट्रीय शाळांमुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाला गती मिळाली. या राष्ट्रीय शाळांमधील शिक्षक स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. ‘ कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे संयोजक डॉ. विलास मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र मुळावेकर यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ज्ञानोबा बोराडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब चारठाणकर, अजित मंडलिक, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, गंगाधर कान्हेकर, रवि कुलकर्णी, प्रविण माणकेश्वर, बाळू बुधवंत यांनी पुढाकार घेतला.