निर्भय बनो : दडपशाही विरोधातील लढाईसाठी सज्ज राहा : डॉ.विश्वंभर चौधरी यांचे आवाहन
सेलूतील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, संविधान बचाव समितीचा पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देशभरातील जनतेच्या अंतर्मनात प्रचंड खदखद आहे. २०२४ मध्ये सर्वसामान्य जनताच मोदी-शहा आणि भाजप सरकारचा पराभव करणार आहे, असे नमूद करून मोदी सरकारच्या नीती आणि धोरणांवर ड़ॉ.विश्वंभर चौधरी यांनी सडकून टीका केली.
सेलू जि.परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून ज्या पद्धतीने लोकशाही, संविधान, स्वातंत्र्य, न्याय व्यवस्था आणि देशातील स्वायत्त संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. सूडबुद्धी, द्वेषाच्या माध्यमातून लोकशाही संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. या दडपशाही आणि हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध अत्यंत जागरूकपणे आणि निर्भयतेने लढाईसाठी सर्वांनी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी केले आहे.
सेलू (जि.परभणी) येथील संविधान बचाव समितीच्या वतीने बुधवारी, ११ ऑक्टोबररोजी सायंकाळी सहा वाजता साई नाट्य मंदिरात आयोजिण्यात आलेल्या व्याख्यानात डॉ.चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, स्वागताध्यक्ष शेख महेमुदसर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देशभरातील जनतेच्या अंतर्मनात प्रचंड खदखद आहे. २०२४ मध्ये सर्वसामान्य जनताच मोदी-शहा आणि भाजप सरकारचा पराभव करणार आहे, असे नमूद करून मोदी सरकारच्या नीती आणि धोरणांवर चौधरी यांनी सडकून टीका केली. चौधरी म्हणाले की, देशात निवडणूक आयोग, निती आयोग, ईडी, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण मोदी सरकारने सुरु केले आहे. त्याविरुद्धचा आवाज दडपून टाकला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि अर्थकारणाचे अदानीकरण सुरू आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘अच्छे दिन’ कुठे गेले माहीत नाही पण, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती, शेतकरी , कामगार, महिला अशा अनेक जीवनमरणाच्या प्रश्नावर बोलायला सरकार तयार नाही. खाजगीकरण व कंत्राटीकरण करून गोरगरीबांना प्रवाहाबाहेर फेकून देण्याचा डाव रचला जात आहे, असे चौधरी यांनी नमूद केले. भाजप संघापासूनच हिंदू धर्माला खरा धोका आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्यात आणि तुमच्या-आमच्यात काही धुर्याचे भांडण नाही. दडपशाहीला विरोध आहे. त्यामुळे आपल्या वाडवडिलांनी दिलेले स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ‘निर्भय बनो’ आंदोलन लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. दडपशाही विरोधात वेळीच जागे झालो नाही, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे डॉ.चौधरी म्हणाले. प्रास्ताविक शेख महेमुदसर यांनी केले. सूत्रसंचालन रामेश्वर पौळ यांनी केले. ॲड.विष्णू ढोले यांनी आभार मानले. व्याख्यानाला हेमंतराव आडळकर, रामनाना पाटील, राजेंद्र लहाने, प्रेक्षा भांबळे, अशोक काकडे, महेश खारकर, नानासाहेब राऊत, साईराज बोराडे आदींसह विचारवंत, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध पक्षातील राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दत्तूसिंग ठाकूर, जाहेद घौरी, श्रीनिवास उघडे, के.डी.वाघमारे, सुनील गायकवाड, शेख साजीद, जकी सर, अमजद बागवान, शेख नफीस, दत्ता श्रावणे, बापू खनपटे, विश्वास शेरे, शिवाजी रणखांबे, राजीक कुरेशी, बापू धापसे, सोहेब जमीनदार, शेख सिराज व संयोजन समितीने पुढाकार घेतला.