सरपंचासह सदस्यांचे चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण
निवडणुकीनंतरही कारभार मिळाला नसल्याची तक्रार
गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. उमरीकर यांनी बुधवारी गावामध्ये भेट देऊन विविध साहित्य संदर्भात चौकशी केली. तत्कालीन ग्रामसेवकाकडून साहित्यविषयक खुलासा घेण्यात येईल, असे उमरीकर यांनी सांगितले. तसेच बुधवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांशी उमरीकर व अमोल माटकर यांची चर्चा केली व उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली, मात्र उपोषण कर्ते ठाम आहेत.
सेलू जि.परभणी : सार्वत्रिक निवडणूक होऊन दहा महिने झाले, तरी सेलू (परभणी) तालुक्यातील शिंदेटाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांच्या हाती पूर्ण कारभार सोपविण्यात आला नाही. गावाच्या विकासासाठी उपलब्ध विविध साहित्याबाबत अधिकार मिळावा या मागणीसाठी महिला सरपंच उपसरपंचासह नवनिर्वाचित सदस्यांनी सेलू पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी (दोन नोव्हेंबर) उपोषणाचा चौथा दिवस आहे. अद्यापही पंचायत समितीच्या वतीने उपोषण थांबविण्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही.
शिंदेटाकळी येथील ग्रामपंचायतीसाठी २० डिसेंबर २०२२ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. सरपंच म्हणून अश्विनी कैलास पवार यांची थेट जनतेतून निवड झाली, तर नऊ सदस्य निवडून आले. मात्र, ग्रामसेवकांनी अद्यापही विविध मूलभूत सुविधांसाठीचे साहित्य, सामानाचा पूर्ण ताबा नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिलेला नाही. निवडणुकीपूर्वी प्रशासक म्हणून ग्रामसेवक आणि अन्य दोन कर्मचारीच कामकाज पाहात आहेत. याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. यासंदर्भात पाठपुरावा करूनही दहा महिन्यांत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाईलाजस्तव आमरण उपोषणाला बसावे लागले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बेमुदत उपोषणामध्ये सरपंच अश्विनी पवार, कैलास पवार, उपसरपंच नंदा पवार, संतराम पवार, सुंदर पवार, मोहन राऊत, रमेश पवार, विलास पवार, रमेश पवार, सदाशिव पवार आदींचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. उमरीकर यांनी बुधवारी गावामध्ये भेट देऊन विविध साहित्य संदर्भात चौकशी केली. तत्कालीन ग्रामसेवकाकडून साहित्यविषयक खुलासा घेण्यात येईल, असे उमरीकर यांनी सांगितले. तसेच बुधवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांशी उमरीकर व अमोल माटकर यांची चर्चा केली व उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली, मात्र उपोषण कर्ते ठाम आहेत.
दहा महिन्यांपासून ग्रामसेवकांनी पूर्णपणे कारभार, साहित्य ताब्यात दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना स्वच्छता, पाणी, आरोग्य विषयक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विकासकामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नियमाप्रमाणे कारभार देईपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. – अश्विनी कैलास पवार, सरपंच, शिंदे टाकळी, ता.सेलू