‘जलतारा’ : मंठा तालुक्यातील 50 गावे बनली पाणीदार; श्रीश्री रविशंकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार गुरूवारी पाहणी
वाटूर येथे गुरूवारी शेतकऱी मेळावा, उपस्थित राहण्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे आवाहन
आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रोजेक्ट अंतर्गत पहिल्या टप्प्यात गेल्या दोन वर्षांत मंठा तालुक्यातील विशेषतः डोंगराळ भागातील ५० गावांच्या शेत शिवारात जलतारा हा जलसंधारणाचा नवा पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात मंठा, परतूर व जालना तालुक्यातील २४५ गावांच्या शेत शिवारात जलतारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुरुवारी ( दोन फेब्रुवारी) रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटूर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जलतारा प्रकल्पाविषयी जाणून घेऊया.
बाबासाहेब हेलसकर, सेलू जि.परभणी
जलसंधारणाचा नवा पॅटर्न ‘जलतारा’
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सोशल प्रोजेक्टच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील ५० गावांमध्ये गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेला जलसंधारणाचा ‘जलतारा’ प्रकल्प अंत्यत प्रभावी ठरला असून मंठा तालुक्यातील 50 गावातील 75 हजार एकर शेतजमीन पाणीदार झाली आहे. त्याचा फायदा शेतकरी व गावकऱ्यांना मिळत आहे. जलसंधारणाच्या अत्यंत सोप्या व परिणामकारक कार्यपद्धतीमुळे टंचाईग्रस्त गावातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. दोन पिके घेणारे शेतकरी चार पिके घेऊ लागले. ज्यातून आर्थिक समृद्धता निर्माण होत आहे. जलताराचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे अतिवृष्टीमध्ये वाहून जाणारी सुपीक माती व पिकांचे होणारे अतोनात नुकसान बहुतांशी थांबण्यास मदत होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जलताराच्या शोष खड्ड्यामुळे पाण्याचा निचरा ताबडतोब होतो व जमीन मशागतीसाठी तयार होते.
काय आहे जलतारा ?
पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर एक एकर क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना एका कोपऱ्याला येऊन थांबते. त्या कोपऱ्याला चार फूट रुंद, चार फूट लांब व सहा फूट खोलीचा एक खड्डा केल्या जातो. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजून टाकावा. पावसाळ्यात वाहून त्या एक एकरमध्ये आलेले सर्व पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जाते.असे प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतात एक एकरमध्ये प्रत्येकी एक खड्डा असं गावभर जेवढे शिवार आहे. त्या ठिकाणी शोष खड्ड्यात पाणी जिरवला जाते. उदा. हजार एकर मध्ये एक हजार खड्डे करता येतात. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून जेसीबी मशीनद्वारे शोष खड्डे करून दिले जातात. शेतकरी श्रमदानातून फक्त त्यामध्ये दगडे भरतात, असे हजारो जलताराचे शोष खड्डे पहिल्या टप्प्यात मंठातालुक्यातील विशेषत: डोंगराळ भागातील शेत शिवारामध्ये शेतीचे पुनर्भरण करण्यात आले आहे.
चार महिने पावसाळ्यात पडलेला पाऊस गावाचे शिवार सोडून बाहेर जात नाही. तो शिवारामध्येच थांबतो व शिवारामध्येच मुरतो यामुळे पाणी पातळी वाढली आहे. गेल्या दोन वर्षात ३७ गावांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊन शेतकरयांना फायदेशीर ठरत आहे. २५ वर्षापासून कोरडवाहू असलेली शेती जमीन पाण्याची पातळी वाढल्यामुळे बागायती बनली आहे. दोन पिकावरून शेतकरी चार पिकावर गेले. पिण्याच्या पाण्याची टंचाई संपली व शेतीला बारमाही पाणी उपलब्ध झाले. त्यातून पिकांची संख्या वाढून आर्थिक समृद्धता निर्माण झाली. तरुण शेतकरी शेतीकडे वळले आहेत. बेरोजगारी कमी झाली. व्यसनाधीनता कमी झाली. गावांमध्ये एकोपा निर्माण झाला. अतिवृष्टीमध्ये वाहून जाणारी माती संरक्षित राहात आहे. जलतारा संपूर्ण प्रकल्प सहा महिन्यांमध्ये पूर्ण होतो. चार महिन्यांमध्ये गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा सर्वे करणे, जिओ टॅगिंग करणे, जमिनीचा उतार काढणे, पाणीपातळी प्रत्येक महिन्याला मोजणे, पीक परिस्थितीची पाहणी करणे. सोबत जलताराचे प्रबोधन करणे आणि एक एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत जेसीबी मशीनच्या साह्याने संस्थेच्या वतीने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एक एकर मध्ये एक खड्डा तयार करून दिला जातो. ज्यात शेतकरी श्रमदानातून दगड भरतात खड्डा बुजून घेतला जातो. विशेषत: एक एकर मध्ये पडलेला पाऊस त्या खड्ड्याच्या माध्यमातून त्याच जमिनीच्या भूगर्भामध्ये मुरतो. परिणामतः संपूर्ण गावाच्या शिवारात असे जलताराचे शोषखड्डे केल्यामुळे शिवारात पडलेला पाऊस वाहून न जाता तिथेच थांबतो व जमिनीच्या भूगर्भात जातो कारण जमिनीच्या पाण्याचा साठा भूगर्भात आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांच्या प्रेरणेने प्रकल्प संचालक मनु नंंबुदिरी (अमेरिका) यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प समन्वयक डॉ.पुरुषोत्तम वायाळ व त्यांच्या टीमने जलतारा विषयीचे प्रशिक्षण बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सोशल प्रोजेक्ट विभागांमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मंठा तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. मागील वर्षी सहा महिन्यात 50 गावात पूर्ण झालेल्या या यशस्वी प्रकल्पानंतर यावर्षी परतूर, मंठा व जालना तालुक्यातील २४५ गावात जलतारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षात भारतातील टंचाईग्रस्त एक लाख गावामध्ये जलतारा करण्याचा संकल्प आहे, असे जलतारा प्रकल्प समन्वयक डॉ.पुरुषोत्तम वायाळ (९४३३४५८९८३) यांनी सांगितले.
गुरुवारी, दोन फेब्रुवारी येथे सकाळी अकरा वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शेतकरी मेळावा होत आहे. वाटूर येथील श्रीश्री ज्ञानक्षेत्र येथे आयोजित या मेळाव्याला परभणी, जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, प्रकल्प समन्वयक डॉ.पुरुषोत्तम वायाळ, परभणी जिल्हा समन्वयक कैलास कदम, किशोर घडे, सचिन कोरडे, गंगाधर हिवरे, आनंद बाहेती, अनुप गुप्ता, रुचिका गुप्ता व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने केले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांच्या प्रेरणेने प्रकल्प संचालक मनु नंंबुदिरी (अमेरिका) यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प समन्वयक डॉ.पुरुषोत्तम वायाळ व त्यांच्या टीमने जलतारा विषयीचे प्रशिक्षण बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सोशल प्रोजेक्ट विभागांमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मंठा तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. मागील वर्षी सहा महिन्यात 50 गावात पूर्ण झालेल्या या यशस्वी प्रकल्पानंतर यावर्षी परतूर, मंठा व जालना तालुक्यातील २४५ गावात जलतारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षात भारतातील टंचाईग्रस्त एक लाख गावामध्ये जलतारा करण्याचा संकल्प आहे, असे जलतारा प्रकल्प समन्वयक डॉ.पुरुषोत्तम वायाळ (९४३३४५८९८३) यांनी सांगितले.
हेही वाचा : सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार