ग्रामपंचायतीत : तरुणाईचाच बोलाबाला; प्रतिष्ठेची बाजी अन् लाखोंचा चुराडा…
सेेलू : प्रस्थापित हादरले : गुगळी धामणगाव, बोरकिनी, डासाळा, शिंदे टाकळीत सत्ता परिवर्तन
विश्लेषण /टीम सकाश
सेलू जि.परभणी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल 20 डिसेंबरला लागले. जिल्हा परिषद गट आणि गणांतील काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी फिल्डिंग लावलेल्या इच्छुकांची या निमित्ताने रंगीत तालीम झाली. तालु्क्यातील प्रस्थापितांना चांगलेच हादरवून टाकणाऱ्या या निवडणुकीत तरूणांईचा अधिक बोलाबाला होता. मोठ्या भरवशाने शंभरावर नव्या कारभाऱ्यांकडे मतदारांनी विश्वासाने गावगाडा दिला आहे. त्याचे चीज करून दाखविण्याची आता वेळ आली आहे.
तरूणाईच्या प्रभावाने बोरकिनी, डासाळा, गुगळी धामणगाव, शिंदे टाकळी गावात सत्ता परिवर्तन झाले. अकरा सदस्यांच्या डासाळा ग्रामपंचायतीत भाजपाच्या प्रियंका दादाभाऊ बोंबले ह्या विक्रमी १,१२० मते घेऊन सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांनी शिवसेनेचे रामराव धापसे (५१२) यांना पराभूत केले. डॉ.संजयदादा रोडगे मित्रमंडळाने त्यांना साथ दिल्याचे मानले जाते. बोरकिनी-नरसापूर ग्रामपंचायतीत सरपंच पदाची लढत चुरशीची झाली. भाजपच्या वनिता आघाव (८१०) यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कल्पना हनुमान मुसळे (८२४ ) यांनी पराभव करीत विजय मिळविला. गुगळी धामणगावात तरुणाईने आणि मतदारांनी कमाल केली. युवासेनेचे तालुकाप्रमुख अतुल डख यांच्या पारड्यात ११७३ मते देऊन सरपंचपदाची माळ घातली. शिवाजी डख यांचा त्यांनी पराभव केला. शिंदे टाकळी येथे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर पवार यांच्या पत्नी दीपाली पवार यांना पराभवाला समोरे जावे लागले.भारतीर जनता पक्षाच्या अश्विनी पवार यांनी सरपंचपदी बाजी मारली. म्हाळसापुरात राष्ट्रवादीचे कमलाकर आवटे (४८५) यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून मतदारांनी सरपंचपदी विराजमान केले. प्रतिस्पर्धी भाजपच्या शोभा गुलाब आवटे (४५८) यांनी चुरशीची लढत दिली. डिग्रस पौळ मध्ये कॉंग्रेसने सत्ता कायम राखली. वैष्णवी चक्रधर पोळ (७६९) सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांना माकपाचे कॉम्रेड रामेश्वर पौळ (४८९) यांनी थेट लढत दिली, राव्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच रमेश शिंदे यानी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. पत्नी मंदाकिनी शिंदे (४०५) यांना सरपंचपदी विराजमान केले. बाजार समितीच्या माजी उपसभापती उषा सदाशिव निकम (३९७) यांचा त्यांनी पराभव केला. माले टाकळीत तिरंगा सामना रंगला. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) ताठे अवघ्या ३३ मतांनी सरपंचपदी विजयी झाले. भाजपचे उमेदवार कैलास ताठे (२५२) आणि युवराज ताठे (३०१) यांनी कडवी झुंज दिली. राधे धामणगाव ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार द्वारका प्रल्हाद गोरे (४५१) यांना सरपंचपदी मतदारांनी कौल दिला. कुपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुक्मिणीबाई प्रसाद गवळे (६०१) यांची वर्णी लागली.
डॉ.रोडगेंनी उधळले विरोधकांचे मनसुबे
रवळगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.संजयदादा मित्रमंडळाने चौथ्यांदा सत्ता कायम राखली.सरपंचपदी दीपक रोडगे (८४३) पुन्हा विराजमान झाले.भारतीय जनता पक्षाचे आत्माराम रोडगे यांनी टफ फाईट दिली; पण राष्ट्रवादीचेच अप्पा रोडगे यांना भ्रमित पाठबळामुळे पराभवाचा सामना करावा लागला. स्वपक्षातील मंडळींनी केलेल्या उघड विरोधामुळे डॉ.संजय रोडगे यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबविली. ‘आर या पार’ या जिद्दीने होम पिच गाजवले. रवळगावातील विकास आणि संपादन केलेला विश्वास याच्या जोरावर मित्रमंडळाच्या पॅनल मागे सक्षम ताकद उभी केली. त्यामुळे विरोधकांसोबत स्वपक्षीयांतील गाव पुढार्यांचे मनसुबे उधळून लावण्यात डॉ.रोडगे यशस्वी ठरले आहेत. विरोधकांना चारी मुंड्यात चित करणाऱ्या डॉ.रोडगेंच्या रवळगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारीवरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले. सोबतच डासाळा ग्रामपंचायतीतही मित्रमंडळाचे सदस्य निवडून आल्याने डॉ.रोडगे यांच्या महत्त्वाकांक्षेला अधिक बळ मिळाले आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाना खराबे व बाजार समितीचे माजी सभापती रणजीत गजमल यांना अधिक मेहनत करण्याची दिशा डासाळा निवडणुकीने दिली आहे. तीही रोडगें यांच्या स्ट्रॅटिजीमुळे, असेच मानले जात आहे.
प्रतिष्ठेच्या बाजीत लाखोंचा चुराडा…
निवडणुका अवघ्या अकराच ग्रामपंचायतीच्या होत्या;पण सरपंचपदासह सदस्यपदांच्या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या गेल्या. काही ठिकाणच्या निवडणुका सहा-सहा महिन्यांपासून चर्चेत आल्या. शेवटच्या क्षणी लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची चर्चा झाली, तर काही गावात तुल्यबळ उमेदवारींनी ‘गुलाला’साठी बेफिकिरीने पैसा उधळला. त्यामुळे आठ-दहा दिवसांतच प्रतिष्ठेच्या बाजीत लाखोंचा चुराडा झाल्याची आकडेमोड सुरू झाली. आता गावगाड्याची जबाबदारी आलेल्या कारभाऱ्यांसमोर विकासाचे नवे आव्हान उभे आहे. गावचे चित्र बदलले पाहिजे. किमान मूलभूत सुविधा ही प्रत्येकाची गरज आहेच; पण गावाचा नाविण्यपूर्ण विकास घडविण्याची जबाबदारी तरूण नेतृत्वावर अधिक आहे. ती पेलण्यासाठी त्यांना शक्ती मिळणारच, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही
हेही वाचा : धनलक्ष्मी : महिला नागरी पतसंस्थेचा शुभारंभ; 75 लाखांच्या ठेवी जमा
हेही वाचा : श्रीसाईबाबा : पाथरीतील श्रीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या
हेही वाचा : संगीत महोत्सव : सेलूतील रसिकांनी शनिवार, रविवार सांगितिक मेजवानी